चेटकीण

चेटकीण

“माय गॉड… रिडिक्युलस… हे कसं शक्य आहे?” इन्स्पेक्टर रमोलाने समोरच्या भयानक दृश्याकडे पाहत म्हटलं… रमोलाने जे पाहिलं ते केवळ अशक्य होतं… अशक्य! तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्यूला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयाण असाच होता. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकीणी सारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. रमोला तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती हू नाही की चू नाही. केवळ शून्यात पाहत होती. यात तिचा काही दोष नव्हता, असंच कुणालाही वाटलं असतं. पण काय घडलं असेल आदल्या रात्री? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनूज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नव्हती. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली काही बोलत नाही म्हणून रमोलाने आपला मोर्चा सविताकडे वळवला… “तुम्हाला काय वाटतं? तुमच्या लहान मुलीनेच तुमच्या नवर्‍याचा खून केला असेल?” सविता अजूनही त्या शॉकमधून बाहेर आली नव्हती… सविताने रमोलाकडे पाहत होकारार्थी मान हलवली. रमोलाला मात्र कळत नव्हतं की एवढूशी ती चिमुरडी, तिच्यात इतका जोर कुठून येईल? आणि इतका निर्दयीपणा? रमोलाला एकवेळ वाटलं की सवितानेच आपल्या नवर्‍याला मारलं असेल आणि वाचण्यासाठी खूनाचा आरोप आपल्या मुलीवर टाकला असेल. पण एखादी आई आपल्या मुलीला अशी का अडकवेल? रमोला सविताच्या बाजूला बसत म्हणाली “तुम्हाला कळतंय ना, तुम्ही काय बोलताय ते?” सविताने होकारार्थी मान हलवली… रमोलाचा अजूनही सविताच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. “हे पाहा, तुम्ही जर स्वतःला वाचवण्यासाठी खोट बोलत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करताय. कारण त्याची शिक्षा त्या लहान मुलीला मिळेल…” सविता काहीच बोलू शकली नाही. ती केवळ ढसाढसा रडू लागली. “खरं सांगा… नक्की काय झालंय…” रमोलाने जरा जरबेने विचारलं… सविता काही बोलणार इतक्यात दरवाजातून आवाज आला… “ती खरं बोलतेय. मीच मारलं अनूजला…” रमोलाने दरवाजा दिशेने पाहिलं तर समोर छोटूशी शाल्मली उभी होती. तिच्या नजरेत खुनशी भाव होते, लहान मुलांची निरागसता कुठेच नव्हती… रमोलाला कळेना नेमकं काय घडतंय… पण शाल्मलीला ताब्यात घेण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. जाताना शाल्मलीने तिच्या आईकडे मागे वळून पाहिलं आणि म्हणाली “आता आपल्यामध्ये कुणीच नाही… फक्त तू आणि मी… मी लवकरच येईन तुला भेटायला…” सविताच्या मनात धस्स झालं… तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता की ज्या मुलीला आपण तळहातावरच्या फोडासारखं जपलं तीच आपल्या विनाशाचं कारण बनेल… “ओह्ह.. शाल्मली…” म्हणत ती पुटपुटली… आणि ढसाढसा रडू लागली…

शाल्मली.. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे. पण ती शारीरिक आणि मानसिक रितीने सुदृढ आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही. चॉकलेट्स, बिस्किट्स, कार्टून्समध्ये तिचं मन रमत नाही. पण ती अभ्यासात वगैरे बर्‍यापैकी हुशार आहे. तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे. तरीही लहान मुलांच्या चेहर्‍यावर जी निरागसता असते, ती निरागसता तिच्यात कधीच नव्हती.

तिची आई सविता ही पुर्वायुष्यात साधारणपणे अशीच होती. थोडी एकलकोंडी. माणुसघाणी. तिचे वडील लहानपणीच वारले. मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला. धन्याढ्य पुरुषांना आपल्या तारुण्याच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे मिळवत राहायचे. त्यामुळे सविताच्या मनावर विपरित परिणाम झाला होता. सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं. सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं. थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री-पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली. ती हळू हळू मोठी होऊ लागली. आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता. सविताची आई फार सुंदर होती. तेच सौंदर्य सवितामध्ये उतरलं होतं. तिला पाहता क्षणी कुणीही तिच्यावर फिदा व्हावं इतकी ती मादक होती. मधाळ जणू मदनाची रती…

कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते. तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहित होती. म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे. मुलंही तिला छेडायची. पण ती मान खाली घालून राहत असे. त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती. तिला या मुलीची खूप दया येत असे. त्या प्राध्यापिकेचं नाव शर्वरी. शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी? नेमकं काय भोगलं असेल हिने? शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली. तिने सुरुवतीला सविताशी बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न केला. “हाय सविता… मला तू तुझी मैत्रीणच समज…” असं म्हणत सर्वरीने मैत्रीचा हात पुढे केला पण… “मला कुणी मित्र मैत्रिण नाही… मी एकटीच चांगलीय” असं म्हणत सविताने तिची मैत्री नाकारली… सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती. पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही. एकदा एक मुलगा सविताच्या खुपच मागे लागला. रात्री अपरात्री तिला फोन करुन, मेसेज करुन त्रास द्यायला लागला. “हे बघ सविता… आपला जीव आलाय तुझ्यावर… आणि मला काय तुला वापरायचं नाहीये. लग्न करेन मी तुझ्याशी. मला जाम आवडतेस तू… आज रात्री माझ्या घरी कुणी नाहीये. ये मजा करुया, पार्टी करुया…” त्या मुलाने सविताला वॉइस मेसेज पाठवून सांगितलं… सविता खूप घाबरली… तिने त्या मेसेजला रिप्लाय नाही दिला पण दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये गेल्यावर त्या मुलाने सविताला गाठलं आणि जाब विचारला, “तू स्वतःला जास्त स्मार्ट समजतेस? हे बघ, आय लव्ह यू… मी तुला विचारत नाहीये की डू यू लव्ह मी ऑर नॉट… तुला माझ्याशी प्रेम करावच लागेल.. कळलं… आज रात्री तू मला माझ्या घरी हवीयस. नाहीतर मी तुझ्या घरी येईन…” नेमकं हे शर्वरीने पाहिलं… शर्वरी धाडधाड पावलं टाकत त्या मुलाजवळ आली आणि तिने जोरात त्याच्या कानाखाली वाजवली… “रास्कल… मुलींना त्रास द्यायला कॉलेजला येतोस?” शर्वरीला पाहून तो मुलगा जरा बावरला… “नो मॅम… सॉरी मॅम…. मी तर फक्त…” “सॉरी माय फुट… तुला आज मी सोडणार नाही. तुला सोडलं तर सगळ्या मुलांना वाटेल की तुम्ही मुलींसोबत काही करु शकता…” असं म्हणत शर्वरीने त्याला खेचत प्रिन्सिपलच्या केबीनमध्ये नेलं… प्रिन्स्पिलने त्याचा चांगलाच समाचार घेतला आणि त्याला दोन महिन्यांसाठी कॉलेजमधून काढूनही टाकलं… या प्रसंगामुळे सविता शर्वरीवर चांगलीच इम्प्रेस झाली होती…

हळु हळू शर्वरी आणि सविता खुपच चांगल्या मैत्रीणी झाल्या. सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी घरी एकटीच राहायची. ती दिसायचीही विलक्षण. म्हणजे ती सुंदर होती, आकर्षक होती यात शंका नाही. इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटायचं. पण ते आकर्षण जरा भितीदायकच होतं. म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे. ती जादूटोणा वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता. पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं. ती एक चांगली प्राध्यापिका होती. पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत. आता सविता तिच्या वाटेला गेली होती. सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी. तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं. तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करुन हिला मिळावयचंच. शर्वरी सविताच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सविताला स्त्री-पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती. म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली गेली. रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात. गप्पा मारत, मजा करत, टिव्ही बघत आणि शरीर सुखाचा आनंद सुद्धा घेत असत. दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्याचं एकमेकांशिवाय कुणीच नाही, अशी धारणा दोघींचीही झाली होती.

पण हळू हळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला. कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती. सेक्स करताना सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभवायचे. पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती. दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं. ती जादू टोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती, ते अगदी खरे होते. तिने अमर होण्यासाठी प्राण्यांचा बळी दिला होता. पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता. सविताला त्रास देणार्‍याचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे, हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं. पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली… सविताला कळेना की काय करायचं. याच दरम्यान पोलिस “त्या” मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले. शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळ केलं. सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजवून सांगितले “सविता, मी जे काही केलं ते तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं. माझं शिक्षण झालं नाही. नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला. पदरात तू होतीस. माझ्यात कोणतेही गुण नव्हते. होतं ते केवळ सौंदर्य.”

सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं. हळू हळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली. मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती. तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं. ती भयंकर विचित्र होती हे खरंय. पण तिचं प्रेमही खरं होतं. शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण शर्वरीने काही दिवसांतच तुरुंगात आत्महत्या केली. हळूहळू सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्ताकातून कधीच फाडून चुरगळून फेकून दिलं होतं. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुलीप्रमाणे तिचं लग्न झालं अनूज सातारकर सोबत. त्यांचा प्रेम विवाह. अनूज हा अतिशय भला माणूस. त्यांचा संसारही सुखाचा होता. त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली, शाल्मली…

आणि आता शाल्मलीने अनूज सातारकरचा म्हणजेच स्वतःच्याच वडीलांचा खून केला होता. अतिशय विक्षिप्तपणे… पण का? कारण… सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच. दोघींनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्याचं एकमेकांशिवाय कुणीच नाही. शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं. तिच्या आणि सविताच्या मध्ये येणार्‍या कुणालाही ती जीवंत सोडणार नव्हती. शर्वरी आता शाल्मलीच्या रूपाने पुन्हा सविताच्या आयुष्यात आली होती… कधीही न सोडून जाण्यासाठी!

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *