बालनाट्य चळवळीची आवश्यकता का आहे?

बालनाट्य चळवळीची आवश्यकता का आहे?

आज आपण ज्या युगात जगत आहोत, त्यात अनेक गोष्टींचं फॅड आलेलं आहे. फॅड हा शब्द मी मुद्दामून वापरतोय. कारण फॅड आलं की त्यातला जिवंतपणा निघून जातो. मी बर्‍याच कुटुंबामध्ये अगदी मुंबई नव्हे तर मुंबई बाहेरच्या कुटुंबातही पाहिलंय की आजकाल आई-बाबांना मम्मी-पप्पा म्हणतात आणि आजी-आजोबांना आई-बाबा. मध्यमवर्गीय व निम्न मध्यमवर्गीय कुटुंबात हे फॅड कसं निर्माण झालं मला कळत नाही. त्याचप्रमाणे विविध गोष्टींचं फॅड आलंय. समर-कॅम्प, नाट्य शिबिर इ. खरंतर नाट्य शिबिर म्हणा, समर कॅम्प म्हणा यात वाईट काहीच नाही. पण जेव्हा फॅड येतं तेव्हा ती यंत्रणा हाताळणारे लोक योग्यच असतील असे नव्हे. जसं की गेल्या काही वर्षांत शालेय रंगभूमीचा विचार होऊ लागला आहे. जी चांगली बाब आहे. मात्र मुलांना प्रशिक्षण देणारे सर्वच प्रशिक्षक योग्य नसतात, उलट अयोग्य असतात. ही खरी चिंतेची बाब आहे. याविषयी या लेखात आपण पुढे चर्चा करुयाच. त्याआधी आपण एक गोष्ट स्पष्ट केली पाहिजे की बालरंगभूमी आणि शालेय रंगभूमी या दोन भिन्न गोष्टी आहेत. एकमेकांत गुंतलेले असले तरी त्यांच्यातील भिन्नता स्पष्ट अजणवते. बालरंगभूमी म्हणजे केवळ बालांनी करावयाचे नाटक नव्हे. तर बालरंगभूमी म्हणजे अशी रंगभूमी जिचा प्रेक्षक बाल आहे. लहान मुलांच्या दृष्टिकोनातून लिहिलेली आणि सादर केलेली नाटके म्हणजे बालनाट्य. बालनाट्य सादर करणारे कलाकार हे प्रौढ असतात. जर त्यात लहान मुलाची भूमिका असेल तर ती लहान मुलाने करावी. मात्र मोठ्यांची भूमिका मोठ्या माणसांनीच करावी. परीकथा, साहसकथा, प्रबोधन, कल्पकता हे बालनाट्याचे विषय असू शकतात. बालरंगभूमीचे प्रेक्षक बाल असल्यामुळे त्यांच्या अनुषंगाने नाटके लिहिणे आवश्यक आहे. शोकांतिका य प्रकाराला तर बालरंगभूमीत मज्जाव आहे. बालनाट्य वरवर पाहता सोपी वाटली तरी लिखाणाच्या दृष्टिकोनातून ती कठीण असतात. अर्थात सादरीकरण तर त्याहून जास्त कठीण. म्हणूनच बालनाट्य लिहिताना खूप काळजी घेतली पाहिजे. एक उदाहरण सांगतो. इदगाह नावाची मुन्शी प्रेमचंद यांची कथा आहे. त्यातील हामिदची परिस्थिती अत्यंत गरीब आहे. आई-बाबा नाहीत. तरी देखील ती शोकांतिका नाही. कारण ती कथा लहान मुलाच्या दृष्टिकोनातून पुढे सरकते. म्हणूनच सामाजिक बालनाट्य लिहायची असल्यास ही काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक संदेश देताना शेवटी मुलांनी पेटून उठणं किंवा बंड करणं हे अपेक्षित नाही.

आपण आधी बालनाट्य किंवा बालरंगभूमी म्हणजे काय हे जाणून घेतलं. आता आपण शालेय रंगभूमीबद्दल चर्चा करुया. शाळेय रंगभूमीमध्ये विद्यार्थ्यांनी अभिनय करणं आवश्यक असतं. इथले प्रेक्षक आणि कलाकार दोन्ही विद्यार्थीच असतात. असं म्हणून शकतो की बालरंगभूमीचं हे एक लहान स्वरुप आहे. प्रायोगिक स्वरुप आहे. या लेखाच्या शीर्षकात बालनाट्य चळवळ असा शब्द असला तरी आपण इथे शालेय रंगभूमीबद्दल चर्चा करणार आहोत. बालनाट्य चळवळीमध्ये शालेय रंगभूमीकडे कानाडोळा केला जातो. महाराष्ट्र शासनाद्वारे शालेय विद्यार्थ्यांसाठी बालनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात येते. यामध्ये पूर्वी वयोमर्यादा १४ वर्षे होती, आता १५ वर्षे करण्यात आली आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे सध्या शालेय विद्यार्थ्यांसाठी नाट्य प्रशिक्षणाचं फॅड आलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्यावर हमखास आपल्याला बालनाट्य प्रशिक्षणाचे बॅनर दिसू लागतील. यात वाईट काही नसलं तरी अनेक प्रशिक्षकांना नाटकच कळलेलं नसतं, तर ते बालनाट्य किंवा शालेय नाट्य काय शिकवणार? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की कोणालाही अभिनय शिकवता येत नाही. हा गुण उपजत असावा लागतो. नाट्य प्रशिक्षणात अभिनयाची तंत्रे शिकवली जातात. शालेय विद्यार्थ्यांना नाट्य प्रशिक्षण देताना त्यांच्या शब्दोच्चारावर भर देणे आवश्यक आहे. कारण अनेक मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असल्यामुळे अनेकांचे मराठी उच्चार चांगले नसतात. तसेच मराठी माध्यमातही हल्ली मुलांच्या उच्चारावर लक्ष दिले जात नाही. म्हणून प्रशिक्षकाला याबाबत ज्ञान असणे आवश्यक आहे. केवळ नाट्यखेळ घेऊन निभावणार नाही. नाट्यखेळ कशासाठी घेतले जातात याचंही भान प्रशिक्षकाला असायला हवं. त्याचबरोबर वय वर्षे ५ ते १५ असा शालेय विद्यार्थी गट असतो. या सर्व वयोगटातील मुलांना नेमके कशाप्रकारे शिकवले पाहिजे याचंही भान असायला हवं.

अनेक पालकांना आपली मुले लगेच स्टार झालेली हवी असतात. मुलं ज्युनियर आर्टिस्ट म्हणून जरी टिव्हीवर दिसली तरी पालकांची कॉलर टाईट होते. मात्र यातूनच फसवणूकीचे प्रकार समोर येतात. सिरियल्समध्ये कॉर्डिनेटर असलेले लोक, ज्यांना कलेचा गंधही नसतो, ते नाट्य शिबिर आयोजित करतात. मालिकांमध्ये काम करण्याचं आमीष दाखवून प्रोफाईलसाठी फोटो काढण्याकरिता पुष्कळ पैसे उकळतात आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून एखाद्या मालिकेत या मुलांना गुरे-ढोर्‍यांप्रमाणे पाठवलं जातं. पालकांच्या अशा स्वभावामुळे मुलांचं आणि पालकंही नुकसान होतं. त्यामुळे पालकांनी सर्वात आधी हे जाणून घेतलं पाहिजे की अभिनय क्षेत्रात काम मिळवणे, काम करत राहणे, टिकून राहणे हे अत्यंत कठीण आहे. दुसरी गोष्ट सगळीच मुले अभिनेते होऊ शकत नाहीत. शालेय रंगभूमीचा उद्देश केवळ मुलांना अभिनेता किंवा कलाकार बनवण्याचा नसून त्यांच्या व्यक्तित्वात विकास घडवून आणणे हा मूळ उद्देश आहे. त्यांना आनंद मिळावा, छंद निर्माण व्हावा हा हेतू असतो. पाडगावकरांनी “सांग सांग भोलानाथ” ही कविता मुलांना आनंद देण्यासाठी रचली असं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आनंद हा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणूनच तुमचा मुलगा नाट्य प्रशिक्षणाला जाऊ लागला तर तो अभिनेताच होईल ही आशा बाळगणे चुकीची आहे. आपण शाळेत गणित हा विषय शिकतो म्हणजे आपण गणिततज्ञ होतो का? विज्ञान शिकतो म्हणजे आपण शास्त्रज्ञ होतो का? हे शालेय अभ्यासक्रमाचे विषय आहेत. यातून मुलांना पुढचा मार्ग मिळत जातो. तसेच शालेय शिक्षणात नाट्य कलेचा समावेश व्हायलाच हवा. मात्र लगेच सगळी मुलं अभिनय क्षेत्रात नाव कमावतील असं होणार नाही. मग तुम्ही विचाराल की बालनाट्य किंवा शालेय नाट्य चळवळीला काय अर्थ आहे? तर एक उदाहरण सांगतो.

दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात व्हेनेझुएला नावाचा एक देश आहे. या देशाची लोकसंख्या सुमारे ३ कोटी आहे. मात्र हा देश गुन्हेगारीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. इथे अनेक वर्षांपासून खून, अपहरण, मानवी तस्करी, ड्रग्ज रॅकेट यांसारखे हिंसक गुन्हे सर्रास घडतात. १२ ते १५ वर्षांची लहान मुलं हातात बंदुका घेऊन खून, दरोडे करण्यास प्रवृत्त होतात. इथे पराकोटीचा भ्रष्टाचार होतो. इथलं सरकार आणि न्यायव्यवस्थाही भ्रष्ट आहे. त्यामुळे कुणीही या देशात फिरायला जात नाही. मात्र इतकी वाईट परिस्थिती असतानाही १९७५ मध्ये एका देवदुताने गुन्हेगारीत भरडलेल्या या देशाला आशेचा किरण दाखवला. त्या देवदुताचे नाव आहे “जोस ऍंटोनियो ऍब्र्यू.” त्यांनी “एल सिस्टेमा” (El Sistema) नावाचा एक संगीत प्रशिक्षण उपक्रम विकसित केला. El Sistema म्हणजे दि सिस्टिम. सामाजिक बदल करण्यासाठी मुलांना, विशेषतः वंचित, मागासलेल्या समाजातील किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलांना मोफत शास्त्रीय संगीत शिक्षण देणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. एका अंडरग्राउंड पार्किंग गराजमध्ये या उपक्रमाची सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ ११ विद्यार्थी आले. पण २०१५ मध्ये ४०० म्युझिक सेंटर्स आणि ७००,००० बाल व तरुण संगीतकार तयार झाले आहेत. विशेष म्हणजे हा उपक्रम व्हेनेझुएलाच्या सीमा ओलांडून सुमारे ६० देशांमध्ये पोहोचला आहे. “सामाजिक बदलासाठी संगीत” (Music for Social Change) हे त्यांचं ब्रीदवाक्य आहे. कारण संगीत व इतर कलांमुळे एकता, बंधुता, परस्परांबद्दल आदर वाढू लागतो. आता El Sistema एक जागतिक चळवळ होऊ लागली आहे. एल सिस्टेमामुळे व्हेनेझुएलाच्या अनेक मुलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडला आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलांमध्ये अमुलाग्र बदल दिसून आला. ते गुन्हेगारीपासून परावृत्त झाले. मुलांना आत्म-नियंत्रण करता आले, वाईट वर्तणुकीवर ताबा मिळवता आला. ही लक्षणे विशेषतः हिंसाचाराला सामोरे जाणार्‍या मुलांमध्ये दिसून येतात. एल सिस्टेमा या उपक्रमाच्या माध्यमातून मुलांचे कौशल्य विकसित केले जाते, ही कौशल्येच त्यांना गुन्हेगारीपासून दूर ठेवतात.

भारत देश हा काही गुन्हेगारांचा देश नाही. हा सज्जनांचा देश आहे. त्यामुळे El Sistema चा उपयोग भारतात आणखी चांगल्या प्रकारे होऊ शकेल. दुसरी गोष्ट वर दिलेले उदाहरण हे संगीत कलेबाबत आहे. मात्र नाट्य चळवळ ही सर्वांगिण असते. त्यात केवळ अभिनय नसून संगीत, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा असे अनेक घटक सामावलेले आहेत. संगीताशिवाय नाटक होऊच शकत नाही. म्हणूनच बालनाट्य चळवळ अत्यंत महत्त्वाची आहे. वरवर पाहता यास नाट्य प्रशिक्षण म्हटले जात असले तरी ही माणून घडवण्याची कार्यशाळा आहे, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. मात्र अट एकच, तुमचा प्रशिक्षक चांगला हवा. अनेक वर्षांपासून शालेय अध्यापनात नाट्य प्रशिक्षणाचा समावेश व्हावा, यासाठी मागणी केली जात आहे. मात्र पूर्वी लोक हा विषय गांभिर्याने घेत नव्हते. गेल्या १०-१२ वर्षांत मात्र हळूहळू बदल घडू लागला आहे. सरकारी यंत्रणा देखील याबाबत सकारात्मक दिसत आहे. मात्र अनेक पालकांना व शिक्षकांना असे वाटते की नाटक केल्याने मुलांचे अभ्यासातील लक्ष उडून जाईल. काही पालक म्हणतात की नाटकात काम केल्यास मूल वाया जाईल. पण असे नसते, ही प्रतिमा या क्षेत्रातील गलिच्छ लोकांनी निर्माण केली आहे. पण या क्षेत्रात अनेक सज्जन लोकही आहेत. यामुळे मुलं चांगल्या वळणावर येतात. मुलांना अभ्यास चांगल्या प्रकारे कळू लागतो. कारण नाटकात संवाद पाठ करावा लागतो, इतकंच काय तर समोरच्याचे संवादही लक्षात ठेवावे लागतात. त्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते, पाठांतराची व आकलनाची क्षमता वाढते. विषय लवकर कळू लागतात. नाटकात संवाद मोठ्याने म्हणावे लागतात, शेवटच्या बाकावर बसलेल्या प्रेक्षकांपर्यंत आपला आवाज पोहोचला पाहिजे. म्हणून बुजरी, हळू आवाजात बोलणारी मुलंही मोठ्याने बोलू लागतात. नाट्य प्रशिक्षणामुळे उच्चार स्पष्ट होतात.

त्याचबरोबर सभाधीटपणा, आत्मविश्वास वाढतो. रंगभूषा, वेशभूषा करावी लागते म्हणून गबाळेपणा जाऊन नीटनेटकेपणा येतो. नेपथ्याच्या माध्यमातून जंगल, रस्ता, घर इत्यादी गोष्टी दाखवल्यामुळे कल्पकता वाढते, मुलांमध्ये स्वतःचे घर सजवण्याची, आपली खोली स्वच्छ ठेवण्याची वृत्ती जागृत होते. नाटक एकट्याचे नसते, तर सगळ्यांनी मिळून करायचे असते. प्रत्येकाला मुख्य भूमिका देता येत नाही. काही सहाय्यक असतात, इतकंच काय तर बॅक स्टेज आर्टिस्ट असतात, जे अभिनय करत नाहीत. पण नाटकाचा भाग असतात. यामुळे सांघिक भावना वाढते. गटबाजी न करता एकत्र येऊन काम करण्याची वृत्ती वाढू लागते. हे लक्षात घेतले पाहिजे की शालेय नाट्याचा उद्देश मुलांना केवळ अभिनेता बनवणे असा नसून एक चांगला जबाबदार माणूस बनवणे असा आहे. आजच्या जगात चांगल्या माणसांची नितांत आवश्यकता आहे. ही चांगली माणसं या नाट्य प्रशिक्षणातून घडतील. कारण यातून व्यक्तिमत्त्व विकास घडत असतो. पालकांनो व शिक्षकांनो, लक्षात घ्या, शालेय नाटकांत काम करणारी सगळीच मुलं भविष्यात अभिनय क्षेत्रात जात नाहीत, एखाद दुसरं मूल या क्षेत्रात करिअर करतं. पण इतर मुलांच्या बाबतीत माणूस होण्याची प्रक्रिया घडते. शालेय नाटकांचे विषय संस्कारक्षम असल्यामुळे मुलांना चांगलं वागण्याचा धडा मिळतो. जसे रस्त्यावर थुंकू नये, कचरा टाकू नये, मोठ्यांशी उलट बोलू नये, अभ्यास व्यवस्थित करावा इ. मात्र तुमचे प्रशिक्षक चांगले असायला हवेत. म्हणूनच पालकांनी त्यांच्या मुलांना चांगली वर्तणूक असलेल्या व्यक्तीकडेच नाट्य प्रशिक्षणाला पाठवले पाहिजे. फसवणुकीपासून, आमीषापासून सावध रहा! दुसरी गोष्ट, तुमच्या मुलांना स्टार बनवण्याच्या मागे लागू नका. त्यांना या कलेचा आनंद घेऊ द्या.

शालेय अध्यापनात नाट्य प्रशिक्षणाचा समावेश केल्याने मुलांमध्ये खरोखरच चांगला बदल दिसून येईल. अत्यंत आगाऊ मुलं सुद्धा जबाबदारीने वागताना मी पाहिली आहेत. मी गेली काही वर्षे नाट्य दिग्दर्शन व प्रशिक्षण देण्याचे काम करतोय. दादागिरी करणारी मुलंही चांगली वागू लागतात, हा माझा अनुभव आहे. त्यांच्या अभ्यासातही प्रगती झालेली मी पाहिली आहे. नाट्य चळवळ या दृष्टीकोनातून खूप महत्त्वाची आहे. मात्र हे फॅड होता कामा नये. मग त्यात दूषितपणा येतो. हा एक चांगला अनुभव असतो. त्यामुळेच नाट्य चळवळीची जितकी समाजाला आवश्यकता आहे, तितकीच चांगल्या नाट्य प्रशिक्षकांचीही आहे. आज नाट्य प्रशिक्षणात सहभागी होणारी मुलं कदाचित भविष्यातील प्रशिक्षक होऊ शकतात. कारण भविष्यात नाट्य प्रशिक्षण व्यवसायाला खूपच चांगले दिवस येणार आहेत. नाटक घडत राहो, सुप्रजा निर्माण होत राहो, हीच रंगदेवतेचरणी प्रार्थना!

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *