प्रत्येकाला हवीहवीशी “भट”शाही…

प्रत्येकाला हवीहवीशी “भट”शाही…

कॉलेजचे ते दिवसच भन्नाट असतात. कुणाच्या तरी प्रेमात पडायचं. कुणाला तरी प्रेमात पाडायचं. सिद्धता नसतानाही मी तुझ्यासाठी चंद्र तारे वगैरे तोडून आणण्याची उगाच प्रौढी मिरवायची. अभ्यास कमी आणि उनाडक्या जास्त, असा तो काळ. शाळेच्या चार भिंतीतून आपण कॉलेजच्या मोकळ्या प्रांगणात येतो तेव्हा ती जी पहिली भावना असते ती प्रचंड विलक्षण असते. एक मोकळा श्वास आपण घेत असतो. आपल्या सिनीयर्सना पाहून आपण त्यांच्यावर फिदा होतो. ते कसे कॉलेजमध्ये बिनधास्त वावरतात. लोक त्यांना मान देतात. मुंबईच्या भाषेत सांगायचं तर त्यांची कशी कॉलेजमध्ये “वट” हाय. या सगळ्या गोष्टी आपल्याला भुरळ घालत असतात. पण तरीही या सर्व गोष्टींपासून अजून बर्‍याच गोष्टी असतात. त्या प्रत्येक गोष्टीवर आपलं प्रेम असतं. प्रेम… एक दैवी भावना. प्रेमात पडायचं आणि पाडायचं ते वय असल्यामुळे बरेच लोक कवितेचा आश्रय घेतात. म्हणून युवक युवती कवितेच्या प्रेमात पडतात. कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहेच ना,

प्रेम कुणावरही करावं.
प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं.
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं.
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं.
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं.
प्रेम कुणावरही करावं…

तसं प्रेम मीही केलं… कवितेवर… सुरेश भटांच्या गझलांवर… तो काळ विद्रोहाचा होता. त्यामुळे माझ्या आयुष्यात आलेले विद्रोही कवी म्हणजे सुरेश भट. आपल्या जीवनात आपण अनेक माणसांना भेटतो, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. कधी कधी असं होतं की प्रत्यक्ष भेटलेली माणसं आपल्या लक्षात राहत नाही. पण अप्रत्यक्ष भेटलेली माणसं मनात घर करु राहतात. यालाच प्लॅटोनिक लव किंवा विशुद्ध प्रेम म्हणतात. सुरेश भट मला भेटले ते झंझावात होऊन. त्यांचं झंझावात हा काव्य संग्रह मी विकत घेतला. त्यातल्या,

तुमची करा आरास अन् तुमचे तुम्ही लावा दिवे
तुमच्यात मी येऊ कसा? बदनाम झंझावात मी !


या ओळींनी मी वेडाच झालो. या दोन ओळींनी मला रात्र रात्रभर झोप लागू दिली नाही. प्रत्येक गोष्टीत गुंतायचं असंच ते वय होतं. कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता चुकायचं असंच ते वय होतं. म्हणूनच या ओळींतून जणू भट माझीच कैफियत सांगत आहेत असं मला वाटाय़चं. मी अगदी खात्रीने सांगू शकतो की त्या काळी माझ्या वयाच्या अनेक नवतरुणांनाही भटांची गझल ही त्यांचीच कैफियत वाटत होती. त्यांच्या शब्दांत एक आपलेपणा आहे. त्यामुळे त्यांची गझल वाचणारा व ऐकणारा त्यांच्याकडे ओढला जातो. पण आज मी जेव्हा तिशी ओलांडली आहे तरीही भटांच्या गझलांमध्ये मी स्वतःला शोधतो. आपण तिशी ओलांडतो तारुण्याकडून प्रैढत्वाकडे आपली वाटचाल होत असते. तेव्हाही भटांची गझल आपल्याला आठवते.

देखावे बघण्याचे वय निघून गेले
रंगांवर भुलण्याचे वय निघून गेले…

उद्या जेव्हा प्रौढत्वाकडून वृद्धत्वाकडे वाटचाल सुरु होईल तेव्हाही सोबतीला भटांची गझल असेलच.

रिमझिमतो रातंदिन
स्मरणांचा अमृतघन
पावसात भिजण्याचे वय निघून गेले…

भट म्हणतात त्याच प्रमाणे गझलमधील प्रत्येक शेर म्हणजे स्वतंत्र कविता असावी लागते. भटांचे अनेक शेर आपण वाचतो तेव्हा याचा प्रत्यय आपल्याला येतो.

तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा ?
किंवा
सोडताना प्राण त्यांना मी कुठे बोलावले?
खातरी झाली न त्याची.. ते घरी डोकावले!
किंवा
माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी
माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा

भटांचा प्रयेक शेर ही एक स्वतंत्र कविता आहे. सुरेश भटम्च्या गझला आज आपण ऐकतो, वाचतो, आपण प्रेरित होऊन कशा गझला रचू पाहतो. पण भटांच्या काळी भटांवर खुपच खालच्या भाषेत टिका झाली होती. भटांच्या गझला म्हणजे भटारखाना आहेत, अशी टिका समीक्षकांनी केलेली आहे. म्हणजेच भट हे गझलांचे कारखानदार आहेत आणि आमच्यासारखे त्यांचे चाहते जे त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आहेत, ते म्हणजे शिकाऊ उद्योजक. पण भटांनी असा टिकाकारांना न जुमानता आपल्या गझलांमधून त्यांना चोख उत्तर दिले.

मठोमठी मंबाजींना कीर्तने करू द्या
विठू काय बेमानांना पावणार आहे?
किंवा
वार झेलायास केली मी खुली छाती जरी
नेमके पाठीस माझ्या चावणारे चावले!
अशा शब्दांत भट या खोट्या अस्मितेच्या छायेत जगणार्‍यांवर शब्दांचे आसूड ओढत राहिले. प्रेम, समाजकारण, राजकारण अशा सर्व विषयांना भटांनी हात घातला.
ईश्वरी इच्छा’च होती कालचा दंगा
माणसांनी माणसांना मारले कोठे?
भटांच्या गझलेतील शब्द, त्यांची रचना ही इतकी सहज जुळून आलेली असते, पण आपण याची कल्पना सुद्धा केलेली नसते. म्हणजे,
ही पहाटेची बरी नाही तुझी घाई…
चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?
“चांदणे बाजूस हे मी सारले कोठे?” हे भट किती सहजपणे लिहून जातात. या असा ओळी भटांना कशा सुचल्या असतील? अशी कोणती दैवी देणगी होती भटांकडे? आता हेच पाहा ना,
तरुण आहे रात्र अजुनी, राजसा निजलास का रे
एवढयातच त्या कुशीवर, तू असा वळलास का रे
अजूनही विझल्या न गगनी, तारकांच्या दीपमाळा
अजून मी विझले कुठे रे, हाय तू विझलास का रे
शृंगार, अगदी स्पष्ट भाषेत सांगायचं तर सेक्सचं वर्णन भटांची लेखणी अशी काही फुलते की तुम्हाला विश्वस बसतो की सेक्स ही देवाने निर्माण केलेली या पृथ्वीतलावरची अत्यंत पवित्र गोष्ट आहे. अशा क्षणी भटांची लेखणी एखाद्या काम-प्रेषितासारखी चालते.
मल्मली तारुण्य माझे, तू पहाटे पांघरावे
मोकळ्या केसात माझ्या, तू जिवाला गुंतवावे
लागुनी थंडी गुलाबी शिर्शिरी यावी अशी, की
राजसा, माझ्यात तू अन्‌मी तुझ्यामाजी भिनावे
या ओळींमध्ये सेक्स आहे. पण विकृती कुठेच नाही. शब्दांत कामभावना आहे, पण वासना कुठेच नाही.

मला आठवेना…तुला आठवेना…
कशी रात्र गेली कुणाला कळेना.
-तरीही नभाला पुरेशी न लाली!

आहाहा… काय बोलावं आता. अनेकांची लेखणी जिथे विसावते. तिथूनच भटांच्या प्रतिभेला सुरुवात होते. सुरेश भटांनी हर तर्हेच्या रचना केल्या. आपल्याला सुरेश भटांनी रचलेले मराठी अभिमान गीत ठाऊक आहे. १९५६ साली आचार्य अत्रेंच्या “दैनिक मराठा”मध्ये भटांची “मराठ्या उचल तुझी तलवार” ही कविता छापून आली होती. त्यावेळी भट हे केवळ २४ वर्षांचे होते. दुसर्‍या बाजीरावने शनिवारवाड्यावर युनियन जॅकचे निशान फदकावले यावर ही कविता रचलेली आहे. ती कविता अशी आहे,

मराठ्या उचल तुझी तलवार
एकिची उचल तुझी तलवार
शपथ तुला — आइच्या दुधाची
घेउ नको माघार, मराठ्या…
शपथ तुला — शिवछत्रपतींची
चळचळ कापत अवनी सारी
काय विसरली दिल्ली तुझिया
तलवारीची धार, मराठ्या…

ही कविता वाचली की आपल्याला चटकन लक्षातच येणार नाही की अशा प्रकारची कविता भट रचू शकतात. या अशा महान कवीवर त्या काळी नको नको ती टिका झाली. त्यांना नको नको ते ऐकावे लागले. पण ज्यावेळी एखादा माणूस पारंपारिक कुंपण कापून बाहेर मोकळा श्वास घेऊ पाहतो. तेव्हा कुंपणाचे पहारेकरी त्या मोकळा श्वास घेणार्‍याला त्रास देऊ पाहतातच. हे प्रत्येकासोबत होतं. पण आज कित्येक जण भटांच्या मार्गावर मार्गस्थ आहेत. भट आज अजरामर झाले, अमर झाले. पण भटांवर टिका करणारे मात्र काळाच्या पडद्याआड अदृश्य झाले. भट म्हणाले होते, त्या प्रमाणेच वर्तमानाला जरि त्यांची भाष कळत नसली, तरी वीजा घेऊन येणार्‍या पिढ्य़ांशी ते बोलत होते आणि त्या वीजा घेऊन येणार्‍या पिढींपैकी एक पिढी आमची सुद्धा होती हे सांगताना मला प्रचंड आनंद होत आहे. भटशाही हा शब्द बर्‍याचदा तुच्छतेने वापरला जातो. पण ही “भट”शाही प्रत्येकालाच हवीहवीशी आहे. भटांनी लाखो लोकांच्या दिलावर राज्य केले. या अर्थाने ही “भट”शाहीच आहे. आज भट आपल्यात नाही. पण त्यांच्या प्रत्येक शब्दांतून ते आपल्याला भेटतात, नव्याने. त्यांनी मराठीला गझलरुपी जी भेट दिली आहे. त्याचे उपकार आपण फेडू शकत नाही. त्यासाठी ते अहोरात्र झटले. त्यांना त्या मोबदल्यात काय आणि किती मिळाले, हे सांगणे कठीण आहे. पण त्यांच्यामुळे मराठी गझलेचं आकाश उजळलं आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर,

मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते…

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *